कर्जत तालुक्यातील रिलायन्स इथेन गॅस लाईन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा रिलायन्स व प्रशासनास १५ दिवसाचा अल्टिमेटम...
ज्ञानेश्वर बागडे-
कर्जत: गेल्या २ वर्षापासून रिलायन्स प्रशासन आणि सक्षम अधिकारी यांच्यासोबत कर्जत तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी पाठपुरावा करत असून प्रत्येक वेळी वेगवेगळी उत्तरे देण्यात आली आणि शेतकऱ्यांना फसविले. जो मोबदला शेतकऱ्यांना सांगण्यात आला त्यानुसार जमिनीचा मोबदला दिला नाही तर काही शेतकऱ्यांना जमिनी अधिग्रहण करूनही आजतागायत कोणताही मोबदला देण्यात आला नाही..गेल्या दोन वर्षापासून प्रकल्पात गेलेल्या जमिनीची नासधूस तसेच कोणतेही उत्पन्न घेता येत नाही.. आणि या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी आज सर्व शेतकऱ्यांनी कर्जत येथील तहसीलदार श्री.विक्रम देशमुख यांना निवेदन देत १५ दिवसात आम्हाला न्याय द्यावा अन्यथा शेतकरी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसतील असा अल्टिमेटम दिला आहे.
रिलायन्स इथेन गॅस दहेज ते नागोठणे पाईपलाईन मध्ये अवसरे, बीरदोले, कोदिवले, वंजारपाडा, तळवडे, पंपलोळी आदी गावातील अन्यायग्रस्त शेतकरी आपल्या जमिनीच्या नुकसान भरपाई साठी या लढ्यात सामील झाले असून तहसीदारांसह, जिल्हाधिकारी तसेच सक्षम अधिकारी श्री.पांडुरंग मगदूम यांनाही या बाबत पत्र पाठविण्यात आले आहे. जर येत्या १५ दिवसात या विषयी कोणताही निर्णय झाला नाही तर साखळी उपोषण केले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे.
रिलायन्स विरोधात अनेक वेळा पत्रव्यवहार केला असून त्यात लवकरात लवकर मोबदला दिला जाईल असे सांगण्यात आले पण आजतागायत कुठलाही मोबदला आला नाही..आणि बरेचदा उडवा उडविची उत्तरे देण्यात आली. पण आता आमचा न्याय हक्कासाठी गुन्हे अंगावर घेण्याची वेळ आली तरी चालेल पण मग हटायचे नाही असा निर्धार सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे.
आमदार तथा उत्तर रायगड चे भाजपा जिल्हाप्रमख प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या आंदोलनाचे नेतृत्व करणारे कर्जत तालुका सरचिटणीस श्री.राजेश भगत, प्रकल्पग्रस्त शेतकरी केशव तरे, नरेश कालेकर, उमेश राणे, मंगेश तरे, बाळा शेकटे, अमर मोगरे, तुकाराम तरे, दिनकर सोनावळे यांनी तहसीलदार यांची भेट घेऊन सदर निवेदन दिले.